वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम – डॉ. गगण गुप्ता
गोंदिया ( देवरी ) : नोव्हेंबरच्या अखेरीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात बदल झाला अन् उष्णतेत वाढ झाली होती. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अचानक ढगाळ वातावरण होत वातवरणात गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणीय बदलाचा परिणाम देवरीकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या अचानक बदललेल्या वातावरणामुळे अंगदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखणे, ताप या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. वातावरणात गारवा पसरला होता, तर दुपारीदेखील हा गारवा कायम असायचा; मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरणातील बदलामुळे तापमानात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. जणू काही ऑक्टोबर हिटसारखी गरमी वाढली होती. अशातच मागील शुक्रवारी 30 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे, तर आज सोमवारी सकाळी तापमानाचा पारा 21 अंशावर आल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा कायम असल्याचे जाणवनार आहे. या वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट देवरीकरांच्या आरोग्यावर होत आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकांना सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे विविध आजारांमुळे शहरातील छोटे दवाखाने, तसेच सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दिवसांपासून दररोज या आजाराचे ३०-४० रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
वातावरणात कशी काळजी घ्यावी…?
ऐन हिवाळ्याच्या दिवसात तापमान वाढले असले, तरी थंड पेयाचे सेवन करणे टाळले पाहिजे. सध्या प्रदूषणदेखील वाढले आहे. ज्यांना श्वसनाचा त्रास होतो, अशांनी मुखपट्टीचा वापर केला पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
प्रतिक्रीया…
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. यामुळे गरम कपडे वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, संसर्गजन्य ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या त्रिसूत्रीचा वापर करा.
डॉ. गगण गुप्ता , ग्रामीण रुग्नालय देवरी.









