महाराष्ट्र : विधान भवनाच्या दोन्ही सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. आता शेतकरी आपल्या शेततळ्यांमधून, विहिरींमधून किंवा स्थानिक जलस्रोतांमधून शेतीकामांसाठी, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा बांधण्यासाठी तसेच शेत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गाळ, माती आणि मुरूम मोफत काढू शकणार आहेत. या गौण खनिजांच्या वापरासाठी असणारे स्वामित्वधन (रॉयल्टी) पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
जलस्रोतांतून गाळ काढण्यासाठी तलाठ्याकडून १५ दिवसांत साधी एनओसी घेणे बंधनकारक असेल, तर स्वतःच्या शेतातील कामांसाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांवर पोलीस अथवा तहसीलदार आता कोणतीही पकडापकडी किंवा जप्तीची कारवाई करणार नाहीत. मात्र, या खनिजांचा व्यावसायिक वापर करण्यास सक्त मनाई असेल.








